सोलापूर शहराचा इतिहास
सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु तसे पुरावे उपलब्ध नाहीत.
सांप्रत, सोलापूर शहर परिवहन कार्यशाळेसमोरच्या बुधवार पेठेतील नवनिर्मित बौद्ध विहाराजवळ काही वर्षांपूर्वी शिलालेख सापडला. तो सर्वज्ञ चक्रवर्ती चालुक्य सोमेश्वर तिसरा (इसवी सन 1127-1168) याच्या कारकिर्दीतील आहे. अभिलाषितार्थ चिंतामणी अथवा ‘मानसील्लस’ या ग्रंथांचा कर्ता तोच. महामंडलेश्वर कलचुरी बिज्जलदेव दुसरा (इसवी सन 1130-1168) याची सत्ता त्या विभागावर होती. त्याची राजधानी मंगळवेढ्यास होती. वीरशैव मतोद्धारक बसवेश्वर हे त्याच्या दरबारात मंत्री होते. पुढे बिज्जलदेवाने चालुक्यांची सत्ता अपहरण करून तो स्वत: सत्ताधीश झाला व त्याने त्याची राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे हलवली. बिज्जलदेवाचा स्थानिक अधिकारी महाप्रधान श्रीकरण कन्नप्पय्य नायक यांनी त्या ठिकाणी एक त्रिकारात्मक मंदिर निर्माण केले. त्या त्रिकुटातील स्थापित देवतांची नावे अनुक्रमे कन्नेश्वर, चट्टेश्वर आणि मल्लिकार्जुन. त्या मंदिरांना बिज्जलदेवांनी भूदान दिले आहे. त्या सर्व नोंदी शिलालेखामध्ये नोंदवताना ते मंदिर सोन्नलिंगे (सोलापूर) येथे उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या लेखाची तारीख आहे 22 डिसेंबर 1135. सोलापूर अस्तित्वात असल्याचा स्पष्ट असा तो पहिला पुरावा होय. त्याचा अर्थ असा नव्हे, की ते गाव त्या काळापूर्वी अस्तित्वातच नव्हते! त्याचे अस्तित्व जरूर असणार; परंतु त्याचा इतिहास मागे किती न्यायचा याचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. तत्कालीन ते स्थान व्यापारपेठ अथवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, अशा नोंदी पुराभिलेखांतून व तत्कालीन ग्रंथातून मिळत नाहीत. तसे जर असते तर बलचुरी बिज्जलदेव किंवा त्या राजघराण्यातील पूर्ववर्ती सत्ताधिकारी यांनी त्यांची राजधानी मंगळवेढ्यास न ठेवता तो मान सोलापुरास दिला असता. परंतु शिवयोगी सिद्धरामांच्या श्रीशैल यात्रेनंतर, त्यांनी सोलापूर येथे निर्माण केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रसिद्धीमुळे सोलापूर प्रकाशझोतात आले. यथाकाल, सिद्धरामांनी तलावनिर्मिती करून त्या गावाचा पाणीप्रश्न सोडवला. त्यापुढे सोलापूरच्या प्रगतीत कोठे अडसर आल्याचे दिसून येत नाही.
इसवी सन 1135 च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.
सिद्धरामनिर्मित कपिलसिद्ध मल्लिक्कार्जुनाचे मंदिर (इसवी सन 1130-1180) अवशेष स्वरूपात किल्ल्यामध्ये उभे आहे. किल्ल्याची निर्मिती ही नंतरची आहे. कल्याण चालुक्याची उत्तम मंदिर निर्मिती म्हणून त्या वास्तूकडे बघण्यास हरकत नाही. हंपी (विजयनगर) चे कवी राघवांक (सुमारे इसवी सन 13 वे शतक) यांनी सिद्धराम पुराणांची पद्यात्मक रचना केली आहे. त्या कृतीचे मूळ नाव ‘सिद्धराम चरित्र’. तो ग्रंथ लिहिताना राघवाकांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे वर्णन करताना त्या परिसरातील इतर मंदिरांचेही वर्णन केले आहे. परंतु त्यातील एकही शिल्लक नाही!
No comments:
Post a Comment